
पिंपरी (प्रतिनिधी), आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात प्रथम वर्ष डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी आणि डॉक्टर ऑफ फार्मसी (फॉर्म डी) अभ्यासक्रमातील नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वर्मा फार्मसीचे संचालक मुकुंद वर्मा तसेच अतिथी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व संशोधन विश्लेषक जितेंद्रकुमार सुथार कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रिअर ॲडमिरल (नि.) अमित विक्रम, प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे, प्रशिक्षण व रोजगार विभागप्रमुख श्रीमती जस्मिता कौर, समुपदेशक श्रीमती श्रुति शेठ, विनिता भट्टाचार्य, सुधीर पंड्या, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. सारिका निकम उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे मुकुंद वर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “फार्मसी इंडस्ट्री ही झपाट्याने वाढणारी उद्योग क्षेत्र आहे. या क्षेत्रात भरपूर रोजगार संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासातील मूलभूत गोष्टी स्पष्ट करून घ्याव्यात आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रानुसार करिअरची दिशा निवडावी.
यावेळी डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रिअर ॲडमिरल (नि.) अमित विक्रम यांनी विद्यार्थी आणि पालकांना संकुलाबद्दलची सविस्तर माहिती दिली व संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे म्हणाले की, “महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत तसेच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक आणि पालक या दोघांचीही जबाबदारी महत्त्वाची आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सर्रास न करता योग्य पद्धतीने आणि गरजेनुसारच करावा. असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमादरम्यान “यकृत विकार (लिव्हर डिसऑर्डर्स)” या विषयावरील तांत्रिक मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मासिकाचे संपादक डॉ. रमेश काटेदेशमुख, प्रा.अबोली मराळे आणि प्रा. काजल भगत मंचावर उपस्थित होते.
तसेच २०२४–२५ या शैक्षणिक वर्षात प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रजत पदके प्रदान करून गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. सारिका निकम, डॉ. प्रियतमा पोवार आणि प्रा. काजल भगत, प्रा. धनश्री गरुड यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी श्रीकांत नाईक आणि श्रेयशी देशमुख यांनी केले.




